शनिवार, १२ नोव्हेंबर, २०११

जाऊया पायरसीच्या गावा

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक स्टेटस वाचला... "पायरसी सक्स!" मीही त्यावर प्रतिक्रिया लिहिली, "पायरसीला नाही म्हणा!" कुणीतरी एवढी मेहनत करून एखादी कलाकृती निर्माण करते आणि आपण निर्लज्जपणे तिचा फुकट आस्वाद घ्यायचा? जेव्हापासून मला हे पटलंय, तेव्हापासून मी पायरसीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो.

आजकाल आपल्याला जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल बघायला मिळतो. आणि ह्या प्रत्येक मोबाईलमध्ये १००-१५० तरी गाणी असतात. ह्यापैकी किती गाणी विकत किंवा न चोरता घेतलेली असतात? शून्य! तुमच्या कम्प्युटरमधील किती चित्रपट तुम्ही सीडी विकत घेऊन कॉपी केलेले आहेत? दहापैकी नऊ वेळा उत्तर शून्य असेल. आजच्या काळात पायरसीचा स्पर्श न झालेली व्यक्ती मिळणं सुखी माणसाच्या सदऱ्याइतकी दुर्मिळ गोष्ट आहे. बऱ्याचदा लोकांना माहितीच नसतं कि पायरसी असं काही असतं किंवा ती वाईट गोष्ट आहे.

पण खरंच पायरसी वाईट आहे का? त्याने कलाकारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं का?

आपण चित्रपट डाऊनलोड करतो किंवा मित्रांकडून कॉपी करून घेतो. पण, म्हणून आपण थीएटरला जायचं थांबवलंय का? आपण प्रत्येक नवीन चित्रपटाची गाणी एक पैही खर्च न करता डाउनलोड करतो. पण, समजा तशी सोय नसती, तर आपण प्रत्येक नवीन गाण्यांची सीडी विकत घेतली असती नाही ना... असं म्हणूया की आपण सर्व नाही, पण काही सीडीज तरी विकत घेतल्या असत्या. पण, अशा लोकांचं काय, की ज्यांच्याकडे केवळ दोन-तीन हजारांचा मोबाईल आहे. त्यांना परवडणार आहे का हे? मग त्यांनी गाणीच ऐकायचीत नाहीत?

मी इथे पायरसीचं समर्थन करत नाहीये. पायरसी अनैतिकच आहे. जे लोक आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत, त्यांनी तर पायरसीचा आधार घेणे हे एखादी चोरी करण्याएवढंच वाईट आहे. पण, तरीही आपण एक गोष्ट दुर्लक्षित करू शकत नाही; ती म्हणजे पायरसीने केलेलं लोकशाहीकरण. पूर्वी चित्रपट आणि गीते ही फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी होती आणि त्यांनाही इच्छा असून प्रत्येक चित्रपट पाहणं किंवा प्रत्येक गाणं ऐकणं शक्य होत नसे. पण पायरसीमुळे एकुणातच चित्रपट-गाणी पाहण्या-ऐकण्याचं प्रमाण खूप वाढलंय. तसंच गरीब-श्रीमंतांमधील ह्या बाबतीतला फरक थोडा का होईना पण कमी झालाय, ही जमेची बाजू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा